जैवविविधतेच्या संवर्धनाने शाश्वत विकास शक्य
[जागतिक जैवविविधता दिवस २०२१- विशेष लेख]
°° जैवविविधतेच्या संवर्धनाने शाश्वत विकास शक्य °°
"जैवविविधतेचे संवर्धन केल्या शिवाय शाश्वत विकास शक्यच नाही, असे अभ्यासकांनी किती वेळाही अधोरेखित केले तरी विकासाच्या मागे धावणाऱ्या माणसाला आपल्या सभोवताली असलेली जीवसृष्टी आणि वनसंपदेचा विसर पडलाय. त्यामुळे या जैवविविधतेचे महत्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली".
२२ मे हा दिवस 'जागतिक जैवविविधता दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जैवविविधतेच्या विषयावरील ज्ञान आणि जागरूकता वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी जैविक विविधतेसाठी 22 मे आंतरराष्ट्रीय दिन जाहीर केला. जैवविविधता दिन 2021 'निसर्गसाठी आम्ही समाधानाचे भाग आहोत' या थीमअंतर्गत साजरा केला जात आहे. सन १९९३ पासून जगभर जैवविविधतेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने २२ मे हा दिवस साजरा केला जातो. तो साजरा करताना अपेक्षित काय आहे, तर आपल्या जवळ असलेलं प्राणिसंग्रहालय, वनस्पती उद्यान, ओढा, तलाव, नदी, पाणथळ जागा, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यानं, पाणवठे, जंगल, पर्वत, वन्यजीव... अशा नैसर्गिक गोष्टी पाहणे; जेणेकरून याबाबतीत आपण जैवविविधतेविषयी साक्षर होऊ!
कारण मानवाचं कल्याण जैवविविधता मजबूत असण्यावरच अवलंबून आहे. नैसर्गिक साधन-संपत्ती व सांस्कृतिकदृष्ट्या आपण बलवान असल्याशिवाय आपली आर्थिक घडी सुद्धा बसू शकत नाही. जिथे जैवविविधता जास्त, तिथले लोक जगात सर्वात जास्त आनंदी व समाधानी असतात. भूतानसारख्या आर्थिकदृष्ट्या गरीब, मात्र जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत असणाऱ्या देशाने हे जगाला दाखवून दिलं आहे. खरंतर आता भूतानी संकल्पना जगाला स्वीकारावी लागेल, अशीच वेळ आली आहे. कारण प्रत्येक गाव जैवविविधातापूरक असण्याची गरज आता निर्माण झाली आहे. किंबहुना जैवविविधता म्हणजे काय ही कळणारी पिढीसुद्धा आता तयार झाली पाहिजे. त्यासाठी जैवविविधता वाचायला शिकवणं गरजेचं आहे, नाहीतर मानवाचा विनाश अटळ आहे. त्यासाठी स्थानिक जैवविविधता संरक्षण व संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय पातळीवरच जैवविविधता पूरक अभ्यासक्रम राबवणं आवशयक आहे.
आपला श्वास, आपली तहान, आपली भूक भागविणारी निसर्गातील व्यवस्था म्हणजे आपली जैवविविधता, अशी सरळ व्याख्या केली तरच आपल्याला जैवविविधता किती संकटात आहे, ते समजू शकेल. पृथ्वीवरील जीवांची विविधता म्हणजे जैवविविधता, ज्यामध्ये निर्मिती आणि जटिलता असते. पृथ्वीवरील सर्वात जास्त जटील असलेली जैवविविधताच ठळकपणे आपले भविष्य आहे. म्हणूनच 'मानवता टिकवायची असल्यास आपल्याला जैव विविधता टिकवली पाहिजे' असं मत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रो. डेव्हिड मॅक्डोनल्ड यांनी व्यक्त केलं होतं. १९८५ पासून त्यांची टीम सातत्याने जैविक विविधता विषयक संशोधन करीत असून यात जगातील जैव विविधता अतिशय वेगाने नष्ट होत असून, त्यामुळे दुसरीकडे समांतर संकटे आपल्यासमोर येत आहेत, असे त्यांनी म्हटले होते.
अगदी सहज सांगायचं तर गुणसूत्रं, प्रजाती, अन्नसाखळी, अनेक परिसंस्था आणि त्यातील अजैविक पर्यावरण यांचाशी असलेलं नातं... अशा विविध सहजीवनामुळेच पृथ्वीवरील अधिवास अनेक लाखो जीवाना राहण्यासाठी लाखो वर्षं अस्तित्वात आहे.
आपलं अन्न, पाणी आणि श्वास फक्त जैव विविधतेवरच अवलंबून आहे. उदा. वनस्पतीशिवाय ऑक्सिजन नाही आणि मधमाशांशिवाय परागीकरण नाही आणि पुढे फळ आणि बियाही नाहीत. म्हणजे मधमाशांमुळे आपण जिवंत आहोत, अस म्हटलं की आपल्याला काहीतरी विचित्र वाटतं. मात्र याच मधमाशांचं एक पोळं आणि त्यातील एक मधमाशी दिवसाला जवळपास १००० फुलांना भेटी देते, यावरून त्यांचं महान कार्य आपल्याला समजू शकतं. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशींचे मोठे उपकार आहेत. मधासारखे अमृत निर्माण करणाऱ्या या किटकाचे अस्तित्व धोक्यात आहे. अशा उपयुक्त मधमाशीचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 डिसेंबर 2017 रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार परवा 20 मे ला हा दिवस जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात आला.
फळं खाणारे पशू-पक्षी अनेक झाडांच्या बियांच्या विस्तारीकरणासाठी मोलाची मदत करतात. म्हणजे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड घेणारी झाडे या फळाहारी प्राणांच्यावर अवलंबून असतात. मानवाला लागणारी अनेक औषधं याच वनातून मिळतात. तसंच शेती करत असताना वाढलेलं मिठाचं प्रमाण कमी करायचं असल्यास देखील अनेक जंगली वनस्पतींचाच वापर करून उपाययोजना केल्या जातात. आजपर्यंत झाडांकडून आपण फक्त घेतच आहोत, आता किमान त्यांना वाचवायची वेळ आपल्यावर आली आहे, ती पण आपल्याच संरक्षणासाठी!
आपल्याला मुंगी, मधमाशी, वटवाघूळ, अनेक कीटक, गांडूळ, पक्षीवैभव, सरडे, पाली, कोळी, विंचू, साप अशे नानाविध पशू-पक्षी ठाऊक असतात. मात्र या पिढीला ही जैव विविधता पुस्तकातून शिकविली जाते. परिणाम वन्यजीवाकडे पाहण्याची आत्मीयता मुलांमध्ये निर्माण होत नाही. नव्या पिढीत प्रत्यक्षातील ज्ञान नसल्याने निसर्गातील अनेक जीव आज संकटात येत आहेत.
वटवाघळं रात्रभर झाडांच्या बिया खाऊन निसर्गात सर्वत्र विस्तारीकरण करण्याचं महत्त्वाचं काम करत असतात. त्यांच्याकडून झाडांच्या अतिशय शक्तिशाली बियाच निसर्गात टाकल्या गेल्याने उगवणारी झाडं निरोगी व दुष्काळाशी सहजपणे सामना करतात. आपले पक्षी तर विविध मार्गांनी आपल्याला खूप मदत करीत असतात. त्यात ज्वारीवरील कीडनियंत्रण करणारी भोरडी, गव्हावरील कीटक खाणारी पाकोळी, शेतातील खतामधील हुमणी खाणारे कावळे, उसातील किडी खाणारे चिटुक, कोतवाल आणि नांगरटीतील अनेक किडे खाणारे बगळे, परागीभवन करण्यासाठी मदत करणारे अनेक पक्षी... अशी साऱ्यांचीच मदत होत असते. साधी घोरपड घेतली, गवताळ भागात एक घोरपड ५० पेक्षा जास्त बिळं करते, यात जलसंवर्धनाचं काम आपोआप मोठ्या प्रमाणात होत असतं. मात्र तिची सध्या मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे, ते थांबवणं गरजेचं आहे. नैसर्गिक व्यवस्थापनासाठी प्रत्येक जीव अतिशय महत्त्वाचा असतो, कारण तो एकदा का नष्ट झाला की आपण पुनर्जीवित करूच शकत नाही. अगदी एक चमचाभर मातीत १०००० ते ५०००० विविध जातीचे जीवाणू सापडतात इतकी विविधता आपल्या मातीत आहे, याकडे कानाडोळा करून चालणार नाही. हे नष्ट होण्याअगोदर वेळीच सर्वांनी त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात. जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे, त्या प्रजातीमुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो, या बाबींचे विश्लेषण केल्यासच कळून येईल.
आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही; तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर)च्या अहवालानुसार जगातील माहीत असलेल्या ५ टक्के प्रजातींपैकी २५ टक्के सस्तन प्राणी, ४१ टक्के उभयचर प्राणी आणि १३ टक्के पक्षी अतिदुर्मीळ झाले आहेत. कारण जसजशा मानवी वसाहती वाढत जात आहेत, तसतशी जैवविविधता संकटात येत चालली आहे. ती वाचवायची, तर निसर्गाला वेळ द्यायला हवा आणि त्याचं संरक्षण करायला हवं. त्यासाठी वन्यजीव संरक्षित क्षेत्रं निर्माण करायला हवीत.
गेल्या शतकात जैवविविधतेमधील घट मोठ्याप्रमाणात लक्षात आली. २००७मध्ये जर्मन फेडरल प्रशासनातील एक मंत्री सिग्मार गॅब्रिएल यानी सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजातीमधील ३०% प्रजाति २०५०पर्यंत नष्ट होतील असे विधान केले. यापैकी ठाऊक असलेल्या वनस्पतींपैकी एक अष्टमांश विलोपनाच्या मार्गावर आहेत. हा विलोपनाचा वेग दरसाल १,४०,००० जाती एवढा प्रचंड आहे. हा धोका मुख्यत्वेकरून पर्यावरणातील असंतुलित बदलांमुळे आहे.
आपल्याकडे संरक्षित वनांचं संरक्षण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे. यात शाश्वत पर्यटन आणि स्थानिक लोकांचं वन्यजीवांकडून होणारं नुकसान टाळण्यासाठी पुरेशी भरपाई देणं अत्यावश्यक आहे. कारण आता वन्यजीव आणि शेतकरी संघर्ष शिगेला पोहचला असून यावर शाश्वत उपाययोजना करावीच लागेल. अन्यथा वन्यजीवांचं अतोनात नुकसान होईल.
जगातील जैव विविधता जसजशी कमी होईल, तसा जगण्यातील आनंद आणि समाधानही कमी होणार आहे, त्यामुळे जैव विविधता वाढविण्यासाठी जगभर प्रयत्न झाले पाहिजेत. एक वेळ वातावरण बदलाचे परिणाम उशिरा होतील आणि दिसतील. मात्र जैव विविधता नष्ट होत राहिल्यास त्याचे परिणाम आताच दिसायला लागलेत आणि त्यानुसार अनेक आजार, विकार, आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे जैव विविधता नष्ट होणे, वातावरणातील बदलापेक्षा सुद्धा महाभयंकर आहे. आपल्या नद्या, समुद्र, पाणथळ जागा, यावर होणारं आक्रमण-प्रदूषण वाढत राहिल्यास आपल्याला पुढील १० ते १५ वर्षांत त्याचे परिणाम भोगावे लागतील. परिणामी आपल्याकडे पुढल्या पिढी साठी नैसर्गिक साधन संपत्ती राहणार नाही.
२०१० हे साल जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. जैवविविधतेचा ऱ्हास कमी करणे, हा त्यामागील उद्देश होता. हवेची गुणवत्ता राखणे, जलशुद्धीकरण करणे, परागण वाढविणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी बाबी जैवविविधतेमुळे साध्य होतात. लोकसंख्यावाढ, निर्वनीकरण, प्रदूषण, जागतिक हवामान बदल इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणांमुळे जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे. परिसंस्थेतील बाह्यजातींचे उच्चाटन करणे, कीटकनाशकांच्या वापरात घट करणे, जैवविविधता राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदे करणे, जनुक पेढी तयार करणे इत्यादी उपायांमुळे जैवविविधता राखता येऊ शकते. जैव विविधता वाचायला शिकविणे आणि वाचविणे. प्रत्येकाने पर्यावरण साक्षर होवून पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी प्रयत्न करावा.
विकास बावनकुळे, पर्यावरण कार्यकर्ता, साकोली
8412971048
vikasbawankule6@gmail.com
Comments
Post a Comment